Reading Time: 4 minutes

नोटबंदीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम झाला, याविषयीची पुरेशी चर्चा खरे म्हणजे होऊन गेली आहे. मात्र अजूनही अधूनमधून ती सुरूच असते. त्याचे कारण एवढ्या मोठ्या अर्थव्यवस्थेत आणि वैविध्यात अर्थव्यवस्थेची स्थिती आणि गती सारखीच असू शकत नाही. त्यामुळे जेव्हा आणि जेथे ही स्थिती बिघडली आहे किंवा तिची गती कमी झाली आहे, असे लक्षात येते, तेथे त्याचे खरे कारण शोधण्याऐवजी त्याला नोटबंदी कारणीभूत आहे, असे म्हणणे सोपे जाते. 

त्यामुळेच संसदेतही अलीकडे ही चर्चा झाली आणि नव्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना, नोटबंदीचा भारताच्या जीडीपीवर नकारात्मक परिणाम झाला नाही, असे सांगावे लागले. 

अर्थात, जीडीपीवर जर नोटबंदीचा खरोखरच असा परिणाम झाला असेल तर त्याचा एवढा विचार करण्याचे काही कारण नाही. 

  • त्याचे पहिले कारण म्हणजे नोटबंदी हे जर्जर रोगावरील ऑपरेशन होते, त्यामुळे त्याचा त्रास झाला असेल तर तो अपरिहार्य आहे. आणि त्याचे दुसरे कारण असे की जीडीपी वाढीच्या निकषांनीच सर्वसामान्य भारतीय नागरिकांचा आतापर्यंत घात केला आहे. 
  • जीडीपी वाढला म्हणजे जणू त्यांच्या खिशात जास्त पैसे गेले, अशी मांडणी केली जाते, ती सर्वस्वी चुकीची आहे. जीडीपीची वाढ ही त्या देशातील संपत्ती किती वेगाने वाढते आहे, हे सरासरीने काढले जाते आणि तो वाटा मुठभर श्रीमंत नागरिकांच्या खिशात जात असतो. त्यामुळे तो निकष सामान्य नागरिकांवर अन्याय करणारा आहे, हे समजून घेतले पाहिजे. 
  • नोटबंदी ज्या प्रमुख कारणांसाठी केली, त्यात देशातील रोखीचे व्यवहार कमी व्हावेत, आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता यावी, बँकिंग करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढावी, रोखीमुळे समाजविघातक गटांना मोकळीक मिळते, त्यांना चाप बसावा, बनावट चलनाचे प्रमाण कमी व्हावे  – या कारणांचा समावेश होता. 
  • गेल्या अडीच वर्षांचा प्रवास असा सांगतो की, रोखीचे व्यवहार कमी होत आहेत. शक्य तेथे डिजिटल व्यवहार करण्याचा प्रयत्न प्रामाणिक नागरिक करत आहेत. इन्कमटॅक्स असो की जीएसटीसारखा अप्रत्यक्ष कर, यात पूर्वीच्या तुलनेत झालेली वाढ उल्लेखनीय आहे. त्यामुळेच सरकार पायाभूत सुविधांवरील खर्च वाढवू शकले आहे. 
  • बँकिंग करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे, हे तर जन धनसारख्या योजनांच्या माध्यमातून समोर आलेच आहे. जन धन खातेदारांची संख्या आता ३५ कोटींवर गेली असून या खात्यांत एक लाख कोटी रुपये जमा आहेत! 
  • दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया तुलनेने कमी झाल्या आहेत. व्याजदर कमी होणे, हा बँकमनी वाढल्याचा थेट परिणाम असतो. ते कमी झाले आहेत आणि घर घेताना कमी झालेला हप्ता हा लाखो नागरिकांना घर घेण्यासाठीचा आधार झाला आहे. भारतात जे मुलभूत आर्थिक बदल झालेच पाहिजेत, असे अनेक अर्थतज्ञ म्हणत होते, त्यातील अनेक बदल हे व्यवहारात अधिक मूल्याच्या नोटा अधिक (८५ टक्के) असल्याने होऊ शकत नव्हते. पण त्याविषयी हे तज्ञ बोलत का नव्हते, हे कळण्यास काही मार्ग नाही. 
  • नोटबंदीने अंतिमत: देशाचे भलेच होणार आहे, हे देशातील अनेक अर्थतज्ञांनी अजूनही मनापासून स्वीकारले नसले तरी नोटबंदी सामान्य भारतीय नागरिकांनी किती चांगल्या पद्धतीने स्वीकारली आहे, याची एक आकडेवारी नुकतीच समोर आली आहे. 
  • त्यानुसार बँकेतून रक्कम काढण्यासाठी आणि बँकेत ठेवण्यासाठी एक कोटी नागरिकांनी आधारकार्ड आधारित पेमेंट चॅनेल वापरण्यास सुरवात केली आहे. असा वापर करणाऱ्यांची संख्या २०१६ पूर्वी अगदीच कमी होती, पण नोटबंदीनंतर त्यात दरवर्षी १५० टक्के वाढ होते आहे.
  • युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) चा वापर सर्वाधिक वाढला आहे, डिजिटल व्यवहार वाढण्यासाठी त्यानंतरचा वाटा अशा मायक्रो एटीएमचा (पीओएस मशीन) आहे. 
  • गेल्या मे महिन्यात या पद्धतीने ९००० कोटी रुपयांचे ३.३५ कोटी व्यवहार झाले आहेत. २०१८ च्या बारा महिन्यात या पद्धतीने २० कोटी व्यवहार झाले होते, पण २०१९ च्या सहा महिन्यातच हा आकडा साडे चौदा कोटींवर गेला आहे. 
  • युपीआयचा वापर हा आर्थिकदृष्ट्या सुशिक्षित तसेच मध्यमवर्गाकडून अधिक होतो. ती संख्या आहे आठ कोटी ग्राहक. पण ज्यांना बँकिंगचा अधिकार मिळाला नव्हता, असे ८० कोटी नागरिक मायक्रो एटीएमचा वापर करू लागले आहेत. ही आकडेवारी नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीए) ची आहे. 
  • सरकारच्या ज्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, त्या अंतर्गत कोट्यवधी नागरिकांना सबसिडीच्या स्वरुपात मदत केली जाते. अशी मदत आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. सुरवातीला हे नागरिक फक्त पैसे काढण्यासाठीच मायक्रो एटीएमचा वापर करतात, पण जेव्हा त्यांची स्थिती सुधारते आणि त्यांना बँकिंग करण्याचे फायदे कळू लागतात, तेव्हा ते बँकेच्या इतरही सेवा वापरण्यास प्रवृत्त होतात. 
  • देशाच्या अर्थव्यवस्थेत भाग घेण्याची संधी त्यांना याद्वारे मिळू लागली आहे. बायोमेट्रिकचा वापर करणे, व्यवहार १० हजार रुपयांपर्यंत मर्यादित ठेवणे, अशी दक्षता या व्यवहारांत घेतली जात असल्याने ते सुरक्षितपणे तर होतातच, पण हा बदल सहजपणे होतो आहे. 
  • देशातील ७२० जिल्ह्यांत फक्त दोन लाख वीस हजार एटीएम आहेत. त्यातील फक्त ४० हजार ग्रामीण भागात आहेत. नव्या निकषांमुळे त्यांची संख्या आणखी कमी होणार आहे. याचा अर्थ मायक्रो एटीएमचा वापर आणखी वाढत जाणार आहे. डिजिटल व्यवहार करण्याची सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे, त्यानुसार सेवासुविधा उपलब्ध करणे, हे रिझर्व बँक आणि संबंधित यंत्रणांचे काम आहे.
  • देशातील नागरिकांना बँकिंग करण्याची सुविधा आणि संधी देणे, याचा अर्थ त्याचा अर्थव्यवस्थेतील सहभाग वाढविणे. देशाच्या वाढत्या संपत्तीचा त्याला वाटेकरी करून घेणे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात हे केवळ बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांतूनच होऊ शकते. 
  • एकेकाळी जगात होणारे हे बदल आपला देश काठावर बसून पहात होता. त्यामुळे त्याचे सर्व फायदे आपल्याला मिळत नव्हते. त्याचे कारण जगजाहीर आहे. १००० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे चलनातील एकूण प्रमाण जर ८५ टक्क्यांवर असेल तर कोण कशाला बँकिंग करेल आणि कर भरेल? नोटबंदीने बँकिंग करणे आणि कर भरण्यास नागरिकांना भाग पाडले. (नोटबंदीनंतर व्यवस्थेत तरलता रहावी यासाठी आणली गेलेल्या २००० रुपयांच्या नोटांचे प्रमाण आता बरेच कमी झाले आहे, पण तीही आता काढून टाकली पाहिजे.) 
  • आपण जी सवय काही केल्या बदलण्यास तयार नव्हतो, ती बदलण्याची अपरिहार्यता नोटबंदी आणि त्यानंतरच्या सुधारणांनी निर्माण केली. अर्थात, सुरवातीला ही सक्ती वाटत असली तरी एक समाज आणि देश म्हणून हे सर्व आपल्या हिताचे आणि फायद्याचे होते आणि आहे. 

काही नागरिकांनी केवळ ग्राहकच राहावे आणि जीडीपीच्या वाढीचे सर्व फायदे आपल्याच ताटात पडावे, असे वाटणारे नागरिक आपल्या समाजात आहेत. त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वत:ला इतके सुरक्षित करून घेतले आहे की नोटबंदीसारखे नवे बदल पुढे गेलेच पाहिजे, असे त्यांना वाटण्याचे काहीच कारण नाही. 

त्यातील अनेकांनी रोखीच्या व्यवहारांत मलिदा कमावून घेतला आहे. आता तो पूर्वीच्या प्रमाणात आणि पूर्वीच्या गतीने मिळत नाही, याचे त्यांना वाईट वाटणे साहजिक आहे. 

पण लोकशाही ही बहुजनांसाठी असते. त्यांचे आर्थिक सह्भागीत्व वाढवायचे असेल तर अशा आर्थिक सुधारणांना पर्याय नाही. मग भले त्यामुळे काहींची सूज कमी झाली तरी चालेल. तशी ती कमी होतेच आहे. अर्थात, काहींची सूज कमी होण्यापेक्षा बहुतेकांचे आर्थिक कुपोषण कमी व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. ती गरज आता चांगल्या गतीने पूर्ण होते आहे, हेच ग्रामीण भागातील मायक्रो एटीएमचा वाढलेला वापर आपल्याला सांगतो आहे. 

– यमाजी मालकर 

[email protected] 

नोटबंदीचे महत्व अधोरेखित  करणारे करसंकलनाचे आकडे

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?,

भारत – पाकिस्तानची करपद्धतीतील ‘भाऊबंदकी’ !

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved. 
Share this article on :
You May Also Like

मृत्युपत्र – मृत्युपत्र म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?

Reading Time: 4 minutes मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

Reading Time: 3 minutes कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

सर्व नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच का आहे?

Reading Time: 3 minutes सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वी झाली, कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येवून प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही “रोगट सूज” होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्वाचे !