Reading Time: 2 minutes

मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग १

मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग ३


आपण कायद्यामध्ये नमूद केलेल्या अनेक तरतुदींचा फार कमी वेळा गांभीर्याने विचार करतो. अनेकजण  ही तरतूद आपल्यासाठी नाहीच अशी पक्की धारणा मनात बाळगून जगत असतात. पण जेव्हा या तरतूदींचं महत्व समजतं तेव्हा मात्र त्याबद्दल गांभीर्याने विचार केला जातो. मृत्यूपत्र-इच्छापत्र हे कायद्याने दिलेलं एक वरदान आहे. याचं महत्व समजून घेतलं तर आपल्या कायद्यामधील ही तरतूद प्रत्येकासाठी आहे याची खात्री पटेल.

मृत्यूपत्र (Will) हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. यामध्ये व्यक्तीने आपल्या मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेचा अथवा आपल्या अल्पवयीन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा याविषयीची तरतूद नमूद करून ठेवलेली असते. अनेकांच्या मनात येणारे प्रश्न म्हणजे मृत्यूपत्र करण्याची खरंच आवश्यकता आहे का? मृत्यूपत्राचा नक्की उपयोग काय ? तसंच अनेकांचा असा गैरसमज आहे की मृत्यूपत्र हे फक्त उद्योगपती किंवा श्रीमंत लोकंच करतात. खरंतर प्रत्येक माणसाला त्याच्या मालमत्तेचं मृत्यूपाश्चात वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. मृत्यूपत्र हा तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. थोडक्यात आपल्या पश्चात आपली मालमत्ता योग्य व्यक्तीच्या हातात जावी  या हेतूने कायद्यानुसार तयार केलेलं कागदपत्र  म्हणजेच इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र. 

मृत्यूपत्र करण्याची अनेक महत्वाची  कारणे आहेत. खाली दिलेल्या मुद्द्यांचा विचार केल्यास मृत्यूपत्राचं महत्व सहज लक्षात येइल.

  1. कुटुंबाच्या भविष्याची तरतूद: सर्वसामान्य व्यक्ती आर्थिक नियोजन करताना सर्वात आधी आपल्या कुटुंबीयांचा त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करत असते. मृत्यूपत्र हे तुमच्या आर्थिक नियोजनाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. मृत्यूपत्र बनवून आपल्या मालमत्तेची विभागणी आपल्या इच्छेनुसार करता येते. कुटूंबातील व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार मालमत्तेच वाटप मृत्यूपत्रात करता येणे सहज शक्य आहे. तसच कुटूंबातील काही व्यक्तींना तुमच्या मालमत्तेतून तुम्ही बेदखलही करु शकता. मृत्यूपत्रातील रितसर विभागणीमुळे भविष्यातील अनेक वादही टळू शकतात. मृत्यूपत्रामुळे तुम्ही कुटुंबातील सदस्यांनाही तुमच्या पश्चात येणाऱ्या अडचणींपासून सुरक्षित करु शकता. याशिवाय जेव्हा व्यक्ती मृत्यूपत्र करुन ठेवते तेव्हा त्या वक्तीच्या  मृत्यपश्चात संपत्तीचे वाटप हे “Indian Succession Act 1925” म्हणजेच “भारतीय वारस अनुक्रम कायदा १९२५” मधील तरतूदींनुसार केले जाते. परंतु मृत्यूपत्राअभावी मात्र व्यक्तीच्या संपत्तीचे वाटप “हिंदू वारसाहक्क कायदा १९५६” च्या तरतुदीनुसार केले जाते. या कायद्यातील तरतूदी काहीशा क्लिष्ट आहेत. तसच यामुळे मृताच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसंच मालमत्तेचे अधिकार मिळवायला खूप वेळ आणि पैसाही खर्च करावा लागू शकतो. काही वेळा यामध्ये कोर्टाकडून हस्तक्षेपही केला जाऊ शकतो.

  2. करदायित्व (Tax liability): टॅक्सच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास ज्या मालमत्तेसाठी  मृत्यूपत्र झालेले आहे अशा मालमत्तेची टॅक्स लायबिलीटी (कर दायित्व) तुलनेने कमी असते.

  3. मालमत्तेचे दान: अनेकांना सामाजिक कार्याची आवड असते. काही व्यक्तींच्या बाबतीत कौटुंबिक जबाबदारीमुळे अथवा अन्य कारणांमुळे ही इच्छा मनातच राहिलेली असते. अशा वेळी मृत्यूपत्राद्वारे संपूर्ण मालमत्ता अथवा मालमत्तेचा काही भाग दान करता येतो. अनेक व्यक्ती आपल्या मृत्यूपश्चात आपली मालमत्ता दान करुन समाजाप्रती असलेली नैतिक जबाबदारी पूर्ण करतात. तसच मृत्यूपत्राद्वारे मृत्यूपश्चात आपली मालमत्ता एखाद्याला बक्षीस म्हणूनही देता येते.  उदाहरणार्थ एखाद्याने आजारपणात सेवा केलेली असते, गरजेच्या वेळी मदत केलेली असते, अथवा आपल्या मुलांचा सांभाळ केलेला असतो अशा अनेक कारणांमुळे एखाद्या व्यक्तीला मृत्यूपत्राद्वारे संपूर्ण अथवा अंशत: मालमत्ता बक्षीस म्हणून देता येते.

  4. मालमत्तेची माहिती: काही व्यक्ती त्यांच्या आर्थिक व्यवहारांबात कमालीची गुप्तता पाळत असतात. नातेवाईक, मित्र मंडळी, शेजारी-पाजारी, इतकंच काय तर पत्नी अथवा पती, मुले, आई वडील यांपैकी कोणालाही त्यांच्या आर्थिक व्यवहारांची कल्पना नसते. तसंच काही व्यक्ती ठराविक मालमत्तेच्या खरेदी-विक्रीबद्दलची माहिती कुटूंबीयांना जाणीवपूर्वक देत नाहीत. अशा परिस्थितीत जर मृत्यूपत्र केलेलं असेल, तर त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात  या मालमत्तेसंबधीतील माहिती त्याच्या निकटवर्तीयांना व कुटुंबीयांना मिळू शकते व या मालमत्तेसंदर्भात जर काही अडचणी आल्या तर त्यासंदर्भात योग्य निर्णय घ्यायलाही मदत होईल.

    मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग १

    मृत्यूपत्राविषयी सारे काही भाग ३

(क्रमश:)

(Disclaimer : येथील लेखांचा हेतू हा फक्त अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे हा असून, कोणतेही आर्थिक मार्गदर्शन व सल्ले देणे हा छुपा अथवा प्रकट हेतू नाही. सदर विषयांसदर्भातील वैयक्तिक आयुष्यातले निर्णय आपल्या नेहमीच्या वकिलांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. Please refer https://arthasakshar.com/Disclaimer.aspx)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.