आपल्या वाजवी इच्छा-आकांक्षा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात आणि आपण आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावं यासाठी गुंतवणूक करावी लागते आणि गुंतवणूक करण्यासाठी काही रक्कम प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवावी लागते. उत्पन्न पुरेसं नसेल तर ते कसं वाढेल याचे मार्ग शोधावे लागतात.हा वैयक्तिक विचार झाला, पण देशाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आपल्या सारखंच आपल्या देशाच्या विकास कामासाठी सरकारला पैसे लागतात.
कर हे सरकारच्या उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन आहे.वेगवेगळ्या मार्गाने अधिकाधिक कर कसा गोळा होईल हे सरकार पहात असते. त्यामधले काही कर सरसकट सर्वांना द्यावे लागतात, (उदाहरणार्थ-जीएसटी) .तर काहीवेळा कर, पगार किंवा व्यवसायाच्या उत्पन्नावर (उदाहरणार्थ-आयकर) द्यावा लागतो. काही कर हे विशेष कर म्हणता येतील, (उदाहरणार्थ- भांडवली नफ्यावरचा कर, आयात निर्यातीवरचा कर).
- आपल्या सरकारचा अर्थसंकल्प तुटीचा आहे, ही तूट भरून काढण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. त्यावर व्याज द्यावं लागत असल्यानं सरकारी खर्चात पर्यायानं महागाईत वाढ होते.
आपल्या देशात लोकांच्या उत्पन्नात प्रचंड तफावत आहे. - 90% संपत्ती, 10% लोकांकडे एकवटली असल्यानं अनेक लोकांना आपल्या किमान गरजा पूर्ण करता येत नाहीत. अशा लोकांसाठी अनेक सरकारी योजना आहेत. तरीही अशी अनेक कुटुंबं आहेत, जी आपल्या गरजा कशाबश्या भागवत असतात.
- याहून थोडा वरचा स्तर असलेले लोक थोड्या वाढलेल्या उत्पन्नावर आयकर देत होते. खरं तर या वर्गानं त्यांच्या अडी-अडचणीसाठी थोडी गुंतवणूक करणं आवश्यक होतं.
कारण कोणतंही असेल, यावर्षी आयकर मर्यादेत नवीन पद्धतीनं मोजणी केल्यास प्रत्येक स्तरावर भरीव वाढ तसंच काही अटी पूर्ण करणाऱ्या ₹ 12 लाखाच्या आत करपात्र उत्पन्न असलेल्यांना आयकर सवलतीमुळे कर द्यावा लागणार नसल्यानं हा वर्ग अधिक खर्च करू शकेल, त्याचप्रमाणे गुंतवणूकही करू शकणार आहे. 90% व्यक्तींचं उत्पन्न या मर्यादेत असल्यानं आता त्यांना आयकर द्यावा लागणार नाही.
- टीडीएस आणि टीसीएस मर्यादा वाढल्या आहेत. याचा मागोवा घेण्याच्या हेतूनं, गेल्या वर्षी आयकर विवरणपत्र भरलेल्या करदात्यांचा तपशील उपलब्ध झाला आहे. ही आकडेवारी 31 मे 2024 पर्यत विवरणपत्र दाखल केलेल्यांची असून त्यातून मिळालेली महत्वाची माहिती पुढीलप्रमाणं आहे..
- विवरण पत्र भरणाऱ्या करदात्यांची संख्या 7,97,12,145 आहे.
72% लोकांनी नवीन करमोजणी पद्धतीचा स्वीकार केला आहे.
(Range- All Taxpayers – Gross Total Income (AY 2023-24) हे सर्व फोटोमधे दाखवले आहे.)
- ज्यांचा आर्थिक स्तर एकदम कमी त्यांना गुंतवणूक शक्यच नाही आणि ज्यांचा आर्थिक स्तर एकदम वरचा आहे, त्यांना असंख्य गुंतवणूक पर्याय आहेत.
आता 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यास कर बसणार नसल्यानं एक मोठा वर्ग आयकरापासून मुक्त होईल. - करवाढीच्या प्रत्येक टप्यात फेररचना झाल्यानं सर्वच करदात्यांचा एकंदरीत कर बऱ्यापैकी कमी होणार आहे. यातले अनेक जण वाचलेला कर खर्च करतील, तर काहीजण बचत आणि त्यातून गुंतवणूक करू शकतील.
- गुंतवणूक करताना आपल्याला ‘वाजवी’ लाभ मिळावा अशी अपेक्षा असणं साहजिक आहे. ‘वाजवी’ हा सापेक्ष शब्द असला, तरी मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना महागाईवर मात करेल असा परतावा मिळू शकेल आणि रक्कमही सुरक्षित राहील असा एक उत्तम पर्याय म्हणजे थोडं थोडं करून लाभांश (डिव्हिडंड) देणारे शेअर्स घ्यावेत की त्यातून मिळणाऱ्या परतव्याची रक्कम, पैसे बँकेत ठेवल्यानंतर मिळणाऱ्या रकमेच्या आसपास असेल.
- भविष्यात मूल्यामधे वाढ झाली की भांडवल वृद्धी होईल आणि कमी जोखीम घेऊन बऱ्यापैकी परतावा मिळेल. ₹ बारा लाखांपर्यंत उत्पन्नावर कर नाही आणि दरवर्षी ₹ एक लाख पंचवीस हजाराचा करमुक्त दीर्घकालीन भांडवली नफा या दोन्हींचा लाभ घेता येईल असं नियोजन करता येईल.
- महागाईशी निगडित पेन्शन न मिळणारे ज्येष्ठ नागरिकही आपली निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम प्रथम स्थिर उत्पन्न देणाऱ्या वरीष्ठ नागरिक बचत योजनेत (SCSS सध्याचा व्याजदर 8.2%), रिझर्व बँकेच्या बदलत्या व्याजदराच्या रोख्यांमध्ये गुंतवून (RBI FRB सध्याचा व्याजदर 8.05%) जास्तीची रक्कम अशा शेअर्समधे गुंतवू शकतात.
- अनेक ब्लू-चिप कंपन्यांचे भाव कायमच जास्त असून त्यातून मिळणारा लाभांश परतावा नगण्य असल्यानं या गुंतवणूकदार वर्गासाठी त्यांचा विचार जाणीवपूर्वक केला नाही.
यासाठी काही निवडक शेअर, त्याचा मंगळवार 18 मार्च 2025 चा बंद बाजारभाव, त्यातून मिळणारा परतावा आणि गेल्या 52 आठवड्यात सर्वात कमी/सर्वाधिक भाव पुढील प्रमाणे आहेत.
शेअर- बंद भाव—परतावा- गेल्या 52 आठवड्यात सर्वात कमी/सर्वाधिक भाव :
● बीपीसीएल, 262, 12.2%, 234-376
● सिपीसीएल 560, 9.82% 433-1275
● एचपीसीएल 324, 9.72% 288-455
● एनएमडीसी 67, 7.37% 60-95
● कोल इंडिया 389, 6.55% 249-544
● वेदांत 460, 6.51% 261-626
● जीपीपीएल 131, 5.54% 123-250
● ओएनजीसी 232, 5.28%, 215-345
● व्हीएसटी 258, 5.28%, 242-436
5% ते 12% लाभांश परतावा मिळणारे हे शेअर्स असून त्यांचा सर्वाधिक भाव आणि सर्वात कमी भाव यात 50% हून जास्त फरक आहे. फारसे कष्ट न घेता वर्षभरानंतर लाभांश घेऊन भाव वर्षभरात 15 ते 20% वर गेल्यास भांडवली नफा मिळवता येणं शक्य आहे.
यातल्या बहुतांश कंपन्या सरकारी आहेत, त्या खनिज, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राशी निगडित आहेत. त्यांनी आपल्या भागधारकांना वेळोवेळी बोनस शेअर्सही दिले आहेत.
सुरक्षित गुंतवणूकीचं हे एक साधन होऊ शकते. 2% ते 4% परतावा देणाऱ्याही अनेक चांगल्या कंपन्या बाजारात उपलब्ध आहेत. या दृष्टीनं आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.
सध्या या सर्व कंपन्या त्याच्या 52 आठवड्यातील सर्वात कमी भावाच्या जवळपास मिळत असल्यानं, इथून त्यांचा भाव खाली जाण्याची शक्यता बरीच कमी आणि वाढण्याची शक्यता बरीच अधिक आहे.अशा पद्धतीच्या कंपन्यांची सविस्तर यादी स्क्रीनर, इटी मनी, मनी कंट्रोल यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपल्या गरजेनुसार त्यांची अधिक माहिती तेथून मिळवता येईल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख कोणतीही गुंतवणूक शिफारस करीत नाही. शेअरबाजारातील गुंतवणूक धोकादायक प्रकारात मोडत असल्याने अशी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी अथवा यातील तज्ज्ञ व्यक्तीशी चर्चा करून मगच गुंतवणूक निर्णय घ्यावा.)