Reading Time: 3 minutes

‘फिर हेरा फेरी’ चित्रपटात बिपाशा बसू, राजूला (अक्षयकुमार) एक गुंतवणूक योजना सांगते. गोड बोलून, खोटं चित्र निर्माण करून त्याच्याकडून मोठी रक्कम घेऊन त्याला आणि त्याच्यासह बाबू भैय्या आणि शाम यांनाही फसवते. त्या खोट्या बोलण्याला फसून मोठी ‘रक्कम’ देण्याची ‘किंमत’ तिघेही भरतात. चित्रपटात बघताना हे सगळं गंमतीदार, विनोदी वाटतं. कारण परदुःख शीतल आणि पर-घटना विनोदी वाटतात.

चित्रपटातील ‘हेराफेरी’ ही कितीही विनोदी वाटो पण वास्तविक आयुष्यात त्यातील एक टक्का जरी घटना घडली वा प्रसंग उद्भवला तरीही होत्याचं नव्हतं होतं. वास्तविक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळतात. ज्याने विश्वास टाकला, ज्याची प्रत्यक्ष फसगत झाली त्याचं आयुष्य उध्वस्त होत. त्याच्या कुटुंबियांचं, जे प्रत्यक्ष निर्णयात सहभागी नसतात पण त्याच्याशी  संबंधित असतात त्यांनांही मोठी झळ पोचते.

अशीच एक फसवेगिरीची घटना घडली महाराष्ट्रातच नेवासा, श्रीरामपूर आणि राहूरीमध्ये. येथील अनेक लोकांची फसगत झाली.

शेतकरी आणि कर्ज हे भारतातील कटू वास्तव आहे. शेतकऱ्यांसाठी कर्ज ही खूप मोठी आणि बऱ्याचदा आवश्यक बाब असते.  शेतीसाठी कर्ज देतो असं सांगून एका  खोट्या कंपनीने श्रीरामपूर तालुक्यातील बत्तीस शेतकऱ्यांची आणि व्यावसायिकांची २३ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली.

  • ३९ वर्षांचे अप्पासाहेब चांगदेव दिघे हे गोणेगाव, ता- नेवासा येथे वीटभट्टीचा धंदा करतात, त्यांनी नेवासा पोलीस ठाण्यात केलेल्या फिर्यादीत म्हटलं की, “जानेवारी २०१८मध्ये त्यांना वीटभट्टी धंद्यासाठी कर्जाची गरज होती. त्यावेळी त्यांना ‘माता अनुसया फायनान्स कंपनी (एमएएफसी)’ मार्फत शेतकऱ्यांना शेतीकर्ज व व्यवसायासाठी कर्ज दिलं जातं ही माहिती मिळाली.
    • त्यानंतर ते सदर कंपनीच्या नेवासा बसस्टॉप जवळील ‘मळगंगा शॉपिंग सेंटर’ येथे असलेल्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा सदर कंपनीचे संचालक (नितीन रामचंद्र माळी रा. बेटीवद धुळे जिल्हा), संचालिका (प्रणाली विजय मोरे रा. देहू रोड पुणे), शाखाप्रमुख (गणेश बाबूराव महिरे रा. मोरगे, श्रीरामपूर) तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
    • अप्पासाहेब दिघे यांनी कर्जासाठी विचारणा केली असता त्यांना, “आवश्यक कागदपत्रांची फाईल बनवून मुख्य कार्यालयाला पाठवून दिल्यावर तुमचं कर्ज २० दिवसांत मंजूर होईल मात्र त्यासाठीची  प्रोसेसिंग फी रु. ६८५०/- भरावी लागेल”, असं सांगण्यात आलं.
    • ‘बँक ऑफ महाराष्ट्र, नेवासा शाखेतून’ संचालक नितीन माळी यांच्या ‘अॅक्सीस बँकेच्या सावेडी शाखेतील’ खात्यावर २९ जानेवारीला रु. ६८५०/- आरटीजीएस द्वारे जमा केले आणि संबंधित कागदपत्रांची फाईलही त्यांना दिली.  त्यानंतर दिघे यांना नितीन माळी यांनी दोन दिवसांत कर्ज मंजुरीपत्र मिळून जाईल असं आश्वासन दिलं.
    • ७ फेब्रुवारीला नितीन माळी यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून कर्जमंजुरीचा फोन केला व मंजुरीपत्र घेण्यासाठी कार्यालयात बोलावून ‘अनुसया फायनान्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड , शिरपूर’ असा  शिक्का असलेल्या लेटरपॅडवर ‘१४ लाख’ रुपयांचं कर्ज मंजुरीपत्र दिलं व प्रोसेस फी, इंश्यूरंस फी आणि इतर काही चार्जेस यासाठी ४८ हजार रुपये भरण्यास सांगितले.
    • कर्जमंजुरीपात्रामुळे कर्ज मिळण्याची खात्री झालेल्या दिघे यांनी १७ फेब्रुवारी २०१८ रोजी ‘बँक ऑफ महाराष्ट्र नेवासा’ येथून नितीन रामचंद्र माळी यांच्या ‘एमएएफसी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीच्या खात्यावर ४८  हजार रुपये आरटीजीएस द्वारे रक्कम जमा केली.
    • त्यानंतर दिघे यांनी सदर कर्ज त्यांना कधी मिळेल याबाबत नितीन माळी यांना वेळोवेळी विचारणा केली असता त्यांनी मार्च अखेर सुरू असल्यामुळे १० एप्रिलनंतर कर्ज मिळेल असं आश्वासन दिलं.  त्यानंतर १० एप्रिलनंतर नितीन माळी यांना फोन करून कर्जाबाबत विचारणा केली असता माळी यांनी गहाणखत म्हणून २८ हजार रुपये भरण्यास सांगितले. तेव्हा मात्र दिघे जरा सावध झाले व त्यांनी माळी यांना ऑफिसमध्ये आल्यावर, तुमच्यासमोर स्टॅम्प ड्युटी व रजिस्ट्रेशन फी भरतो असे सांगितले. त्यानंतर मात्र माळी यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन मिळू लागली.  
    • काही दिवसांनी ‘एमएएफसी प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी बंद झाल्याचं समजल्यावर आप्पासाहेब दिघे यांनी नितीन माळी यांस वेळोवेळी फोन करून, त्यांचं कर्ज प्रकरण रद्द  करण्यास सांगून त्यासाठीचे भरलेले पैसे परत मागितले. परंतु दरवेळी सबबी सांगून टाळाटाळ करण्यात आली. तेव्हा अप्पासाहेब दिघे यांना नितीन माळी यांनी त्यांची फसवणूक केल्याची खात्री पटली.  
    • त्यानंतर एमएएफसी कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी, सौ जया अंबादास लोखंडे, अंबादास लोखंडे व सचिन विलासराव कडू (तिघेही नेवासा येथील रहिवासी) यांच्याकडून कळलं की त्यांच्याप्रमाणे इतर ३१ खातेदारांचीही फसवणूक झाली आहे.
  • आरोपी नितीन रामचंद्र माळी, प्रणाली विजय मोरे व गणेश बाबूराव महिरे या तिघांनी कर्ज मंजूर करतो म्हणून अगोदर अनामत (डिपॉझिट) पैसे भरा सांगून दिघे यांचे ५४ हजार ८५० रुपये व इतर  खातेदारांचे २२ लाख ८३ हजार ५०० रुपये अशी एकूण २३ लाख ३८ हजार ३५० रुपये लंपास केले व संगनमताने फसवणूक करून पळून गेले.
  • अप्पासाहेब चांगदेव दिघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट ७३९/२०१८ भारतीय दंड विधान कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेराफेरी करणारे  चित्रपटात पकडले जावोत अथवा न जावोत, त्यांना शिक्षा मिळो अथवा न मिळो पण वास्तविक आयुष्यात मात्र पकडले जायलाच हवेत. तरच सर्वसामान्य नागरिकांना असं फसवण्याची हिम्मत कोणी करणार नाही.

संदर्भ: https://www.deshdoot.com/froud-loan-farme-newasa/

 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2P0w7NE )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मोबाईल चोरीला गेलाय? बँकेबाबत ऑनलाईन माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे पालन

Reading Time: 3 minutes गर्दीत असताना फोन चोरीला जाण्याची दाट शक्यता असते. फोन चोरीला गेल्यानंतर वैयक्तिक…

ऑनलाईन व्यवहार करताना भीती वाटते? या टीप्स नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes मागच्या दोन वर्षात म्हणजे कोविड दरम्यान झपाट्याने काही बदललं असेल तर ते…

Ponzi Schemes: फसव्या योजना कशा ओळखाल?

Reading Time: 2 minutes गुंतवणूक तर सगळेच करतात. ज्या गुंतवणुकीमध्ये आकर्षक परतावा असेल, त्या गुंतवणुकीला लोकं प्राधान्य देतात. साहजिकच आहे, पैसा कोणाला नको असतो? पण, हे साध्य करायचा मार्ग कोणता आणि कसा आहे, याची माहिती असल्याशिवाय फक्त आकर्षित व्याजदरांमागे धावू नये. लक्षात ठेवा चकाकतं ते सोनं नसतं. आकर्षक परताव्याच्या चकचकीत ऑफर्स फसव्या असू शकतात.