काय आहे निवृत्तीनियोजनाचे गणित?

Reading Time: 4 minutes सध्या तरुणांमध्ये लवकर रिटायर होण्याचं एक स्वप्न फॅशन किंवा फॅड सारखं दिसून यायला लागलंय. वयाच्या ४५-५० वयापर्यंत उत्पन्न, जबाबदाऱ्या वगैरे विवंचनेतून बाहेर पडून पुढचं ‘लाईफ एन्जॉय’ करायचं. मात्र हे व्यवहारात उतरवण्यात एक मोठी समस्या असते. लवकर रिटायरमेंटमुळे एकीकडे कमाईची आणि गुंतवणुकीची वर्षे कमी होतात, तर दुसरीकडे साठवलेली पुंजी जास्त वर्षे पुरवावी लागते. म्हणजेच ४५व्या वर्षी रिटायरमेंट घेणाऱ्याला निधी जमा करायला वीसच वर्षे मिळतात आणि ती पुंजी वयाच्या नव्वदीपर्यंत म्हणजे पुढील ४५ वर्षे पुरवणे गरजेचे ठरते. अर्थातच त्यासाठी कमाईच्या वर्षात बचत किंवा गुंतवणुकींसाठी उत्पन्नाचा फार मोठा भाग बाजूला काढावा लागतो. हे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही.