Reading Time: 3 minutes

“लाव रे तो व्हिडीओ..”

“होय मी लाभार्थी….”,

“अच्छे दिन…”,

अशा हिट झालेल्या टॅगलाईन असोत वा प्रचाराच्या सभा, सोशल मीडियावर प्रत्येकजण हिरीरीने आपलं मत मांडत असतो. पण यांच्यापैकी मतदानाचा हक्क किती लोक बजावतात? लोकसभेच्या मतदानाचे आकडे काही प्रमाणात वाढले असले, तरी फारसे समाधानकारक नव्हते. 

यावर्षी तर वीकेंडला जोडून आलेल्या सुट्टीमुळे अनेकांचे पिकनिक प्लॅन्सही ठरले असतील. मतदानाला मिळणाऱ्या सुट्टीचा उपयोग मतदानासाठीच करणाऱ्यांची संख्या अगदीच तुरळक असेल. जे लोक काही कारणांमुळे वेगवेगळ्या शहरात स्थलांतरित झाले आहेत, त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी आवर्जून आपल्या मूळ गावी जा.

NOTA चा अधिकार आहे हे मान्य. पण उठसूट प्रत्येक निवडणुकीला प्रत्येकानेच मतदान करायचं नाही, असं ठरवलं तर लोकशाही चालणार तरी कशी? प्रत्येक मत योग्य उमेदवार निवडण्यासाठी आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असतेच. परंतु, एका दिवसाच्या मजेसाठी आपल्या हक्क आणि कर्तव्याला विसरु नका.  मतदानाच्या दिवशी मत देऊन तुमच्या सुट्टीचा सदुपयोग करा. मत दिल्यानंरही उरलेल्या वेळेत तुम्ही सुट्टीचा आनंद घेऊ शकता.

मतदानाची करण्याची महत्वाची कारणे:-

१. लोकनायकाची निवड:- 

  • आपली नेहमी तक्रार असते की आपल्याकडे योग्य रस्ते नाहीत, पायाभूत सोयीसुविधा नाहीत, पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही, सगळीकडे भ्रष्टाचार आहे. 
  • या परिस्थितीत आपली अपेक्षा असते की नायक मधल्या अनिल कपूरसारखा कोणीतरी “नायक” येईल आणि एका दिवसात या सगळ्या समस्यांना दूर करेल. 
  • पण प्रत्यक्षात असा कोणी नायक कधीच येत नसतो. आणि तो यावा असं वाटत असेल, तर त्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे. समाजहिताचे काम करणारा एखादा चांगला उमेदवार निवडल्यास आपल्या समस्या दूर होण्यास मदत होईल.

२. मतदान हे केवळ हक्क नाही तर कर्तव्य आहे :

  • मतदान करणे हा निव्वळ आपला अधिकार नसून कर्तव्य देखील आहे.
  • आपला देश प्रजासत्ताक आहे आणि योग्य उमेदवार निवडणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
  • एक चांगला नेता ५ वर्षांमध्ये  सुरक्षा, प्रगती आणि विकास घडवून आणू शकतो. त्यामुळे योग्य नेता निवडण्यास मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 

३. प्रत्येक मत महत्वाचे

  • एक किंवा दोन व्यक्तींनी मतदान न केल्यास काय मोठा फरक पडणार आहे, असा विचार कधीही करू नका.
  • समाज म्हणजे अनेक व्यक्तींचा समूह. परंतु हा समूह तयार होण्यासाठी प्रत्येक एक व्यक्ती महत्वाची असते. 
  • आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य. त्यामुळे नेता निवडण्याची जबाबदारी आपण आनंदाने स्वीकारली पाहिजे. कारण आपण निवडलेला नेता हा आपल्यासाठी काम करणार असतो. हा नेता म्हणजे जनतेचा सेवक असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. 
  • लोकशाहीचा सन्मान ठेवून आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा वापर करा. 

४. समाजव्यवस्था:

  • एक सुजाण नागरिक म्हणून केवळ जातीवर आधारित (तो माझ्या जातीचा आहे, असा विचार करून) कोणत्याही उमेदवाराला मत देऊ नये. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर आपण चांगला डॉक्टर बघतो की त्याची जात बघतो? पेट्रोल- डीझेल भरताना ते कुठल्या धर्माच्या देशातून आले आहे ते बघून भरतो का? इतकंच काय तर, भाजी घेतानाही आपण जिथे चांगली भाजी मिळते तिथेच घेतो, तेव्हा भाजीवाल्याची जात, धर्म , लिंग यापैकी कुठल्याही गोष्टीचा आपण विचार करता नाही. त्याचप्रमाणे  निवडणुकीला मतदान करताना त्याच्या पात्रतेचा विचार करा. 
  • ज्याला तुम्ही तुमचा नेता बनविण्यासाठी मत देणार आहात तो त्या पदाच्या योग्यतेचा आहे का? हा विचार महत्वाचा. मताच्या बदल्यात कोणत्याही उमेदवाराकडून कोणतीही भेटवस्तू किंवा आर्थिक लाभ स्वीकारू नये. कायद्याने हा गुन्हा तर आहेच, पण त्याचबरोबर हा लोकशाहीचा अपमान आणि आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग करण्यासारखं आहे. 
  • तुमचे एक मत समाजाचा नेता ठरविण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे कोणतीही चुकीची विचारसरणी आणि प्रलोभने यांच्यापासून दूर राहा आणि योग्य उमेदवारास मत द्या.
  • आपल्या मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. त्यांचे शिक्षण, व्यक्तिमत्व, त्यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी तर नाही ना, या सर्वाचा विचार करून निर्णय घ्या. तुमचं एक मत अशा उमेदवाराला सत्ताधारी होण्यापासून रोखू शकतो.

मतदान का करायचं? निव्वळ आपला अधिकार आहे म्हणून की यादीत आपलं नाव आहे म्हणून? का सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करायचा म्हणून? यापैकी कुठल्याही कारणाने तुम्ही जर मतदान करत असाल, तरीही हरकत नाही. फक्त मतदान करताना योग्य उमेदवाराला मत द्या. तुमचं मत तुमच्या देशाचं/राज्याचं/जिल्ह्याचं भवितव्य ठेवत असतं. 

टिम अर्थसाक्षर प्रगत, जागृत, सामर्थ्यशाली लोकशाहीचा पुरस्कार करते. 

सत्ताधारी पक्ष कायम बदलते असतात. बऱ्याचदा त्यांची विचारधारा पण कालानुरूप बदलते. अर्थसाक्षरता हा सरकार किंवा राजकीय पक्षांपेक्षा मोठा आणि खोल विषय आहे. तेव्हा आम्हाला सर्वच पक्ष आवडतात. कुठल्या पक्षाला मतदान करायचे आहे, का करायचे आहे ते तुम्ही ठरवा. कुणालाही मतदान करा पण या मतदानाच्या पवित्र कर्तव्यापासून पळून जाऊ नका. 

“मी मतदान करणारच !”  हे वाक्य स्वत:शी किमान ३ वेळा तरी म्हणा आणि मतदानाला जा, इतरांनाही मतदान करायला प्रवृत्त करा !

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा-

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/  

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.