भांडवली बाजार १०० ट्रीलीयन डॉलर 
https://bit.ly/37nilkl
Reading Time: 4 minutes

भांडवली बाजार: १०० ट्रीलीयन डॉलर 

जगातील भांडवली बाजार म्हटल्यावर आकडेवारी निश्चितच मोठी असणार. जगातील भांडवली बाजारांचे एकूण मूल्य प्रथमच विक्रमी १००.५ ट्रीलीयन डॉलर म्हणजे सात हजार चारशे लाख कोटी रुपये एवढे प्रचंड झाले आहे. या बाजारमूल्यात गेल्या काही वर्षांत झालेल्या आणि नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या बदलांचे प्रतिबिंब दडले आहे. या सर्वव्यापी बदलांकडे आपण कसे पाहणार आहोत? 

भांडवली बाजार: १०० ट्रीलीयन डॉलर 

  • सर्व जगातील अर्थव्यवस्था संघटीत होते आहे आणि तिचा वेग तंत्रज्ञानामुळे गेल्या काही दशकात प्रचंड वाढला आहे, हे आपण जाणतोच. पण त्याचा पुरावाच आता जगातील भांडवली बाजारांनी दिला आहे. 
  • ही प्रक्रिया केवळ प्रगत देशांपुरतीच मर्यादित असती, तर गेल्या शतकात आपण जसे, अशा अनेक प्रकारच्या आर्थिक आकडेवारीकडे दुर्लक्ष करू शकत होतो, तसे यावेळीही त्याकडे दुर्लक्ष केले असते. कारण गेल्या शतकात आपला या आकड्यांशी काही संबंधच येत नव्हता. पण या शतकात ज्या ज्या गोष्टी प्रगत जगतात घडत आहेत, त्यांचा आणि आपला थेट संबंध आता प्रस्थापित होऊ लागला आहे. 
  • १९९१ ला म्हणजे तब्बल २८ वर्षांपूर्वी आपण स्वीकारलेल्या जागतिकीकरणाचा हा अपरिहार्य असा परिणाम आहे. 

भांडवली बाजार: तरलता वाढल्याचा परिणाम 

  • एक आकडेवारी अशी आली आहे की जगभरात जेवढ्या लिस्टेड कंपन्या आहेत, त्यांचे बाजारमूल्य प्रथमच १००.५ ट्रीलीयन डॉलर म्हणजे सात हजार चारशे लाख कोटी रुपये एवढे प्रचंड झाले आहे.
  • जगाचा जीडीपी मोजण्याच्या काही प्रचलित पद्धती आहेत, पण त्यात सर्वाधिक एकमत असलेली जी पद्धत आहे, त्यानुसार जगाचा जीडीपी सध्या १५० ट्रीलीयन डॉलरच्या घरात आहे. 
  • या दोन आकड्यांची थेट तुलना होऊ शकत नसली तरी या पार्श्वभूमीवर भांडवली बाजाराच्या १००.५ ट्रीलीयन डॉलर मूल्याकडे पाहिले पाहिजे. 
  • कोरोनाच्या संकटामुळे भारतासह जगातील भांडवली बाजार मार्च महिन्यात कोसळले. त्यावेळी हे बाजार मूल्य घसरून ६१.६ ट्रीलीयन डॉलर इतके झाले आणि हे संकट कमी होण्याची शक्यता निर्माण झाली की त्यात गेल्या चार पाच महिन्यात विक्रमी म्हणजे तब्बल ६३ टक्के वाढ झाली.
  • कोरोनामुळे जगात आर्थिक पेचप्रसंग निर्माण होऊ नये म्हणून सरकारांनी आपापल्या देशांच्या व्यवस्थेमध्ये पैसा ओतला. त्यामुळे तरलता वाढली आणि फिरत फिरत हा पैसा शेअर बाजारांमध्ये उतरला. त्याचा हा परिणाम आहे. 

सर्वाधिक वाटा अमेरिकेचा

  • भांडवली बाजारातील १००.५ ट्रीलीयन डॉलर पैसा म्हणजे नेमका किती पैसा, हे समजून घेतले पाहिजे. 
  • रुपयात तो सात हजार चारशे लाख कोटी इतका होतो. 
  • जगातील पैसा तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या ओढून घेत आहेत, त्यामुळे या रकमेतील ४१.६ ट्रीलीयन डॉलर वाटा एकट्या अमेरिकेचा आहे, याचे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. 
  • फेसबुक, पल, अमेझॉन, नेटफ्लिस्क, गुगल आणि मायकोसॉफ्ट या तंत्रज्ञान कंपन्यांचे ग्राहक जगभर आहेत. या सर्व कंपन्या अमेरिकी आहेत. त्यामुळे भांडवली बाजारातील रकमेचा सर्वाधिक वाटा अमेरिकेचा आहे. 
  • जगाच्या व्यापारात आपले प्रभुत्व गाजविण्यास निघालेल्या चीनचा वाटा यात दुसऱ्या क्रमांकाचा म्हणजे १०.७ ट्रीलीयन डॉलर एवढा आहे. 
  • भारताचा यात दहावा क्रमांक असून भारतीय शेअर बाजाराचा वाटा २.४ ट्रीलीयन डॉलर म्हणजे १८० लाख कोटी डॉलर (पाच डिसेंबर रोजीच्या निर्देशांकानुसार) इतका झाला आहे. याचा अर्थ भारताच्या जीडीपीमध्ये संघटीत क्षेत्राचा वाटा वेगाने वाढत चालला आहे. 
  • आकडेवारीच्या जंजाळात अधिक न जाता असे म्हणता येईल की असंघटित क्षेत्राचा वाटा जगभर कमी होत असून त्याच वेगाने संघटीत क्षेत्राचा वाटा वाढत चालला आहे. 
  • ही आर्थिक विषमता केवळ एकाददुसऱ्या देशापुरती मर्यादित नाही, ती जगव्यापी आहे. 

सौदीची जागा कॅनडाने का घेतली? 

  • जागतिकीकरणामुळे जग आता असे काही जोडले गेले आहे की त्याचे परिणाम कोणीच टाळू शकत नाही. 
  • उदा. भांडवली बाजाराच्या हिस्याचा विचार करावयाचा तर सौदी अरेबिया सातव्या क्रमांकावर होता, पण कोरोनामुळे जग थांबले आणि पेट्रोल डीझेलची मागणी कमी झाल्याने इंधनावर अर्थव्यवस्था अवलंबून असलेले देश आर्थिक संकटात सापडले. 
  • इंधनाचे दर पुन्हा वाढताना दिसत असतानाही तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे मूल्य वाढते आहे आणि इंधन कंपन्यांचे मात्र त्या तुलनेत वाढत नसल्याने जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अरमाको या सौदी कंपनीचे मूल्य न वाढल्याने सौदीची जागा आता कॅनडाने घेतली आहे. 

भारतातही आयटी, फोनचा बोलबाला 

  • ही विषमता जशी देशादेशांना लागू आहे, तशी एकाच देशातील क्षेत्रांना लागू आहे, हेही समजून घेतले पाहिजे. 
  • उदा. अमेरिकी भांडवल बाजारात पल कंपनीचे बाजारमूल्य विक्रमी दोन ट्रीलीयन डॉलर एवढे प्रचंड झाले. 
  • जग आता फाईव्ह जी तंत्रज्ञानाची प्रतीक्षा करत असून त्यात या कंपनीच्या फोनला मागणी वाढेल, असा अंदाज करून या कंपनीच्या शेअरला मागणी आली आहे. (पल कंपनीचा एक शेअर सध्या ४६८.७ डॉलर म्हणजे सुमारे ३५ हजार रुपयांना आहे.) 
  • गेल्या दोन वर्षांत कोणतेही नवे संशोधन न करता केवळ पल फोन आणि त्यावर चालणाऱ्या पच्या वापराचे नेटवर्क जगभर वाढवून या कंपनीने यावर्षी १२ टक्के अधिक नफा मिळविला आहे. यावर्षी तिचा नफा सुमारे ७० हजार कोटी रुपये एवढा आहे. 
  • केवळ ही कंपनीच नव्हे तर सर्वच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे बाजारमूल्य सातत्याने वाढते आहे.
  • भारतीय शेअर बाजारातही सर्व आयटी आणि फोनशी संबधित कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले आहे.
  • उदा. भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सच्या व्यवहारात जिओ सेवेचा वाटा वाढला आहे तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची – टीसीएस ही आयटी क्षेत्रातील कंपनी आहे. 

संयमित वापरच महत्वाचा ठरणार 

आता या सर्व आकडेवारीकडे आपण कसे पाहायचे? जागतिकीकरण आणि भांडवलशाहीचा हा परिपाक आहे, असेही आपण म्हणू शकतो किंवा नव्या काळातील अपरिहार्य बदल असेही त्याला नाव देऊ शकतो. पण लक्षात घेतले पाहिजे की आपण काहीही म्हटले तरी परिस्थिती बदलत नाही. त्यामुळे परिस्थिती बदलण्याची वाट पहायची की परिस्थितीनुसार आपण बदलायचे, हा विचार केला पाहिजे. हा विचार म्हणजे आपल्याला पेच वाटत असेल तर पुढील काही मुद्दे आपल्याला योग्य विचाराकडे घेऊन जाण्यास मदत करतील. 

  1. तंत्रज्ञानाचे महत्व यापुढील काळात असेच वाढत जाणार आहे. 
  2. जे तंत्रज्ञान आपल्या समकक्ष स्पर्धकांनी स्वीकारले आहे, ते आपण नाकारू शकत नाही. 
  3. संपत्तीचा मोठा वाटा यापुढे संघटीत क्षेत्राकडे जाणार असल्याने शेअर बाजारासंबंधित गुंतवणुकीचे महत्व वाढणार आहे. 
  4. जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञानाच्या अनेक लाटा आल्या आणि त्याच्या स्वीकाराविषयी समाजात वाद झाले, मात्र अंतिमत: तो बदल सर्वांनाचा स्वीकारावा लागला. (उदा. संगणकीकरण, डिजिटल व्यवहार, मोबाईल फोन, ऑनलाईन खरेदी) 
  5. तंत्रज्ञानाचा विकास हा जागतिक स्पर्धेचा तसेच संरक्षण सिद्धतेचा भाग झाल्याने त्यात मागे राहण्याची जोखीम कोणताही देश घेऊ शकत नाही. 
  6. या सर्व बदलाचे आपण केवळ साक्षीदार नसून लाभधारक आहोत आणि ज्याला जेव्हा शक्य होते, तेव्हा तो हे बदल आपल्या आयुष्यात स्वीकारून टाकतो, असाच अनुभव आहे. 
  7. हे बदल जर योग्य नाहीत, अशी कोणी मांडणी करत असेल तर त्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांची आणि त्यासाठी जगात मोठा राजकीय बदल घडवून आणण्याची क्षमता प्रस्थापित करावी लागेल. 
  8. तंत्रज्ञानाचा अधिकाधिक लाभ घेणारे आणि ज्यांना ही संधी कोणत्याही कारणाने मिळू शकत नाही, अशा दोन वर्गातील विषमता नजीकच्या भविष्यात वाढत जाणार आहे. 
  9. सर्व तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराचे काही विपरीत परिणाम समाजाला सहन करावे लागणार आहेत. 
  10. अत्याधुनिक तंत्रज्ञानातील काय स्वीकारायचे आणि त्याचा संयमित वापर कसा करावयाचा, हे ज्यांना कळेल, तेच या बदलाचे खरे लाभधारक ठरतील. त्यासाठी विवेकाने या बदलांचा स्वीकार करणे, हाच समृद्ध आयुष्यातील सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे. 

– यमाजी मालकर 

[email protected] 

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.