शेअर मार्केट हा विषय जितका पैसा आणि बुद्धिमतेशी निगडीत आहे. तितकाच भावनात्मकतेशी पण जोडला गेला आहे. कसं ते बघू . शेअर मार्केटचं अगदी ताजं उदाहरण घ्यायचं झालं, तर सेंसेक्स जोरदार म्हणजे तब्बल १७७० अंकानी खाली आलं आणि निफ्टी जवळपास ५४५ अंकानी खाली आलं.
कारण युद्धाचं वाढतं संकट असो किंवा आपल्याकडे फ्युचर आणि ऑप्शन मधले बदललेले नियम असो. अगदी सगळ्याच क्षेत्रामधे म्हणजे ऊर्जा, फार्मा, इन्फ्रास्ट्रक्चर, तेल, ऑटोमोबाइलमधे तूफान विक्री झाली. यामधे दिवस सरताना गुंतवणूकदारांचं बरंच नुकसान झालं. मात्र या परिस्थितीकडे बघताना गुंतवणूकदारांनी भावनिकरीत्या खचून न जाता किंवा अधिक घाबरून न जाता मनाने खंबीर राहणं आवश्यक आहे.
- शेअर मार्केटमधे गुंतवणूकदार रोजच वेगवेगळ्या परिस्थितीमधे अनेक निर्णय घेत असतात. कधी-कधी तर नुकसान होतय, हे माहित असताना सुद्धा गुंतवणूकदार भावनिकरीत्या एखाद्या स्टॉकमधे अडकून पडतात. याचा परिणाम अर्थातच तोटा आणि नुकसान हाच असतो.
- इथे गुंतवणूकदाराने भावनेच्या आहारी न जाता, स्टॉकचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे. सदर स्टॉक खरेदी केला त्यावेळी आणि आज कंपनीची मूलभूत परिस्थिती यात काय फरक आहे ? यात फरक पडला असेल तर तो सकारात्मक आहे की नकारात्मक ? याचा विचार केला गेला पाहिजे.
ट्रेडिंग सायकॉलॉजी म्हणजे काय?
- गुंतवणूकदाराची भावना आणि मानसिक स्थिती, त्याला योग्य-अयोग्य निर्णय घेण्यासाठी मदत करत असते. एखाद्या गोष्टीकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.
- स्टॉक मार्केट जेव्हा खाली येत असतं, तेव्हा भीती वाटणं साहजिक आहे. ती एक मानसिक स्थिती आहे, पण या भीतीवर नियंत्रण ठेवणं तुमच्या हातात आहे.
- तसंच ग्रीड म्हणजे लालसा. मार्केट जेव्हा सकारात्मक असतं आणि गुंतवणूकदाराला अपेक्षेपेक्षा अधिक नफा मिळालेला असतो; तेव्हा कुठल्या क्षणाला त्यातून बाहेर पडलं पाहिजे हे समजलं पाहिजे.
- आणि हा निर्णय घेता येणं म्हणजे कदाचित मानसिकरीत्या पण तुम्ही खंबीर असून योग्य निर्णय घेऊ शकता हे सिद्ध होतं.
- अर्थात या सगळ्या गोष्टी आणि तुमचं गुंतवणुकीचं ध्येय याचाही विचार होणं आवश्यक आहे. म्हणजे गुंतवणुकीचा कालावधी जर दीर्घकालीन असेल आणि एखाद्या राजकीय, भु-राजकीय किंवा वाईट बातमीमुळे स्टॉक मार्केट पडले. तर त्या बातमीचा प्रभाव असेपर्यंतच मार्केट खाली असणार. “टाइम इट्सेल्फ इज अ मेडिसिन !” नंतर काही काळानंतर मार्केट पूर्वस्थितीवर येणार !
- पण या गोंधळून टाकणाऱ्या परिस्थितीत तुम्ही घाबरून किंवा अमुक एक मित्र काही सांगतोय म्हणून एखादा चुकीचा निर्णय घेऊन बसलात तर मात्र तुमचं नुकसान कोणीही थांबवू शकत नाही.
- तसेच गुंतवणुकीचा कालावधी जर दीर्घकालीन नसेल, तर मात्र अश्यावेळेस सारासार विचार करून, मार्केटमधल्या एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडू शकतो.
वॉरेन बफे यांच्या काही लोकप्रिय विचारांपैकी काही विचार पुढीलप्रमाणे-
- “ गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्वाची गुणवत्ता म्हणजे बुद्धिमत्ता आणि स्वभाव नाही, तर तुम्ही करू शकणारी सर्वात महत्वाची गुंतवणूक ही स्वतःमधे आहे.”
- अर्थात, लेखामधे वर म्हंटल्याप्रमाणे स्टॉक मार्केटमधे काही गोष्टी कधी अपेक्षेप्रमाणे होतील किंवा नाही.
पण तुम्ही त्याला कसे सामोरे जाता हे तुमच्यामधे असणाऱ्या गुणांमुळेच निश्चित होणार आहे.
- त्यामुळे मार्केटमधे गुंतवणूक करण्याआधी स्वत:मधे गुंतवणूक करणं, हे मार्केटसोबतच आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरू शकतं !!
- गुंतवणुकीसाठी आवश्यक असणारा संयम, प्रतिकूल परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता या गोष्टी साध्य करणं गरजेचं आहे.
- “ तुम्ही स्वत: जर खड्ड्यात सापडले असाल, तर आधी खोदणे थांबवा.”
- शेअर मार्केट, म्युच्युअल फंड हे जोखीम असणारे आहे. यातली गुंतवणूकही पूर्णपणे शेअर मार्केटवर अवलंबून आहे. मार्केटचा प्रवाह हा बऱ्याच गोष्टींमुळे ठरत असतो.
- तेव्हा आपण केलेली गुंतवणूक ही प्रत्येकवेळी श्रेष्ठ असेल आणि राहील या भ्रमात राहणं योग्य नाही.
- यामुळे जर कुठल्याही क्षणाला आपला निर्णय चुकला आहे असं वाटलं तर चुकलेला निर्णय त्याक्षणी दुरुस्त करा. तरच अधिक नुकसान होण्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकाल.