यूपीआयनं आर्थिक क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे. आर्थिक व्यवहार करणं सोप्प झालं आहे, तुमचं कोणत्याही बँकेत खातं असो, एका साध्या अँपवरून केवळ पिन आणि आभासी पत्यावरून डोळ्यांचं पातं लवतं न लवतं, तोच पैसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवता येणं शक्य झालं आहे.
- असे व्यवहार केवळ आभासी पत्ता असेल तरच नाही तर बँकेचे डिटेल्स टाकून, बँक खात्यास संलग्न मोबाईलवर, स्कॅनर वापरूनही करता येतात. तुमचं जिथं खातं आहे त्या बँकेद्वारे, भीम या सरकारी अँपद्वारे, फोन पे, जी पे यांचा वापर करूनही करता येतात. हे व्यवहार दोन व्यक्ती, दोन व्यापारी, ग्राहक व्यापारी असे कोणत्याही प्रकारचे असू शकतात. या सुविधांमुळे बँका, ग्राहक आणि व्यापारी यांची सोय होते.
- 11 एप्रिल 2016 रोजी प्रायोगिक तत्वावर ही प्रणाली चालू झाली. आणि 25 ऑगस्ट 2016 पासून बँकांनी यूपीआय आधारित अँप्स प्ले स्टोर्सवर उपलब्ध करून दिली.
- हे व्यवहार करण्यासाठी काही शुल्क लागणं अपेक्षित होतं, पण डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी ते विनामूल्य उपलब्ध झालं. आता व्यापारी-व्यवहार करण्यात अल्प शुल्क घेतले जात असले तरी ते व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवहारांच्या उलाढालीवर अत्यल्प प्रमाणात द्यावे लागते.
- या व्यवहारांना खरी गती मिळाली ती कोविड काळात, सन 2020 पासून गरज म्हणून अथवा नाईलाज म्हणून ही पद्धत अनेकांनी स्वीकारली आणि आता एकूण व्यवहारांच्या 50% अधिक व्यवहार या डिजिटल माध्यमातून होत आहेत.
- ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यात अनेक बदल करण्यात येत आहेत. क्रेडिट लाईन ही सुविधा येथे उपलब्ध केली आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डाचा वापर करूनही असे व्यवहार करता येतात.
- यात एकाहून अधिक बँक खाती व्यवहार करण्यासाठी वापरता येतात. याशिवाय मर्यादित रकमेचे व्यवहार करण्यासाठी इंटरनेटची गरज नसणं, तसंच किरकोळ रकमेचे केवळ खर्चांचे व्यवहार यूपीआय लाईट या वॉलेटचा वापर करून करता येतात.
- एका विशिष्ट मर्यादेच्या खाली ही रक्कम गेल्यास वॉलेट आपोआप टॉप-अप होईल अशी स्थायी सूचना (Standing Instruction) देता येते.
- यूपीआय वर आधारित अन्य अँप्स वापरून विशिष्ठ दिवशी नियमित व्यवहार करण्याची सूचना देऊन गुंतवणूक करता येते. मासिक बिले भरता येतात.
- व्यापारी आपल्या बिलाची मागणी या माध्यमातून ग्राहकाकडे करू शकतात. नजीकच्या काळात यातील व्यवहार मर्यादेत गरजेनुसार वाढ करण्यात येणार असून मूळ वापरकर्त्याच्या मर्यादेत त्याचे नातेवाईक कोणत्याही खात्याशिवाय असे व्यवहार करू शकतील.
- मुलांना पॉकेटमनी देणं आणि ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे किरकोळ व्यवहार कमी जोखमीसह सहज करता येणं शक्य होणार आहे.
नक्की वाचा: वैयक्तिक आयकर -काही प्रश्न आणि उत्तरं
यूपीआय व्यवहारात सातत्यानं वाढ होत असून सन 2024 या पूर्ण वर्षभरात 172 अब्ज व्यवहार झाले आहेत, आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 44% आहे. व्यवहार रक्कम ₹ 247 लाख कोटी होते, जे मागील वर्षीच्या तुलनेत 35% अधिक आहे. यामधे मिळणाऱ्या सोयींमुळे व्यवहारात दिवसेंदिवस वाढच होत राहील आणि भविष्यात रोखीने व्यवहार करणाऱ्याचे प्रमाण नगण्य असेल. रोख व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला कदाचित काही प्रमाणात सेवाकर द्यावा लागण्याची शक्यता आहे.
हे व्यवहार सुलभ सुरक्षित आहेत, तसेच त्यात काही धोके आहेत. तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे, की काही लोक त्याचा दुरूपयोग करत आहेत. त्यासाठी नवनव्या युक्त्या शोधून काढत आहेत. त्यामध्ये बोलण्यात गुंतवून ओटीपी मागणं, केवायसी नसल्यानं खाते बंद होईल असं सांगून आधार पॅन मिळवणं, डिजिटल अटक करणं इ. यामध्ये फसणारे केवळ अशिक्षित नाहीत तर अनेक उच्च विध्याविभूषित आहेत. यासंबंधात सर्वांनीच काय करा आणि काय करू नका याबाबत जनजागृती केली जात असले तरी भामटे त्याच्या एक पाऊल पुढे आहेत.मग यापद्धतीने व्यवहार करायचे नाहीत का? तर याचं उत्तर म्हणजे सर्व व्यवहार सावधता बाळगून करायचे एवढंच आहे. ‘सावध तो सुखी’ हा मंत्र लक्षात ठेवायचा.
यूपीआय लाईट वापरताय, सावधान! असंही होऊ शकतं?
अलीकडे एक माझ्या बाबतीत असा किस्सा घडला रक्कम अगदीच किरकोळ आहे; पण हे कसं झालं असेल त्या संबंधात उत्सुकता आहे. 19 फेब्रुवारीला संध्याकाळी पनवेलहून येताना एपीएमसी मार्केट बाहेरच्या एका फळ विक्रेत्याकडून संध्याकाळी 06:25 वाजता मी ₹130/- ला एक किलो सफरचंद घेतली. त्यानंतर 06:29 ला ₹100/- देऊन सव्वा किलो द्राक्ष घेतली. यासाठी मी यूपीआय लाईट या वॉलेटचा वापर केला.
यामध्ये एका वेळेस अधिकतम ₹500/- चे किरकोळ आणि दिवसभरात एकूण ₹4000/- चे व्यवहार करता येतात, त्यासाठी पिन आवश्यक नसतो. स्कॅन किंवा स्वाईप केल्यावर व्यवहार पूर्ण होतो. वॉलेटमधील शिल्लक ₹200/- च्या खाली गेल्यास ही रक्कम आपोआप बँक खात्यातून टॉप अप केली जाते. हे किरकोळ व्यवहार आपल्याला बँक खात्यात दिसत नाहीत; अँपमध्ये दिसतात. व्यवहार झाल्याचा एसएमएस बऱ्याच वेळानंतर बहुतेक दुसऱ्या दिवशी येतो, किंवा काही वेळा येतही नाही. ग्राहकाच्या दृष्टीने उपयुक्त अशी ही पद्धत याची एका वेळेची अधिकतम मर्यादा ₹1000/- पर्यत आणि वॉलेट अधिकतम मर्यादा ₹2000/- वरून ₹5000/- करण्याचे प्रस्तावित आहे. या व्यवहाराचे संदेश ग्राहकांना ताबडतोब मिळावेत अशी अपेक्षा आहे.
मी 06:25 वाजता ज्यांच्याकडे सफरचंद घेतली त्याला ₹130/-दिले आणि व्यवहार पूर्ण झाल्याचे स्पीकरवर ऐकले नंतर द्राक्ष घेतली घरी आलो. त्यांनतर बाहेरगावी गेलो असता 23 फेब्रुवारीला यूपीआय लाईट मधील झालेले व्यवहार सहज तपासून पहात असताना 06:26 मिनिटांनी ₹99/- वजा झाले आहेत, हे पाहिले. असा कोणत्याही विषम रकमेचा व्यवहार मी केलेला नसल्याने सहज लक्षात आले. ज्या व्यापाऱ्याला मी ₹130/- दिले त्यालाच ते ₹99/- गेले आहेत हे माझ्या लक्षात आलं. काय करावं, इतरांना सल्ला देण्याचा कसोटीचा क्षण माझ्यावर आला. मी जवळपास असतो, तर चार लोकं घेऊन जाऊन काहीतरी करता आलं असतं. रक्कम किरकोळ आहे, ती विषम संख्येमध्ये नसती तर कदाचित लक्षात आली नसती. व्यवहार तपशील इतका हुबेहूब आहे की मीच तो व्यवहार केला असावा, असे वाटेल. परंतु मी तो व्यवहार केला नाही हे कसं सिद्ध करणार? म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो असं म्हणतात.
नॅशनल सायबर क्राइमच्या पोर्टलच्या 1930 या टोल फ्री क्रमांकाला मी सर्व तपशील देऊन तक्रार केली आहे. तक्रार नोंदवून घेणारी व्यक्ती ती घेण्यास नाखूष होती आणि मला चुकीचा सल्ला देत होती. तरी मी त्यांना तक्रार नोंदवण्याचा आग्रह धरला, त्यांनी तक्रार क्रमांक तयार करून, मी राहतो तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार वर्ग केली आहे, अशा आशयाचा संदेश मला 24 फेब्रुवारीला पाठवला आहे. काय होतंय ते पाहुयात मी त्याचा पाठपुरावा करेनच. विक्रेत्याकडे असलेल्या स्कॅनरमधेच काहीतरी गडबड असावी असा माझा अंदाज आहे. माझ्या परिचयातील अनेक जाणकार व्यक्तींशी बोलून मी त्यांना आवश्यक ती माहिती दिली आहे. यासंदर्भात कोणी अन्य जाणकार मदत करू शकत असल्यास त्याला सर्व तपशील देण्याची माझी तयारी आहे.
परिचयातील एका तज्ज्ञ व्यक्तीनं हे झालं कसं हा मोठा विषय आहे, पण असं होऊ नये असं वाटत असल्यास काय करावं यासंदर्भात सल्ला दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार,
- यूपीआय लाईट हे वॉलेट गैरसोयीचे वाटत असल्यास हेच नाही तर असं कोणतंही वॉलेट अथवा अँप वापरू नये.
- तरीही वापरायचं असेल तर एका व्यवहाराची आणि दिवसातील एकूण व्यवहारांची अधिकतम मर्यादा निश्चित करून घ्यावी.
- जिथे जिथे शक्य असेल तिथे दोन चरणातली पडताळणी ( Two step verification) करूनच व्यवहार करावेत.
अविश्वसनीय वाटत असली तरी ही सत्य घटना आहे. तेव्हा सुजाण ग्राहक या दृष्टीने आपण काय करू शकतो, तर
- अनोळखी ठिकाणी शक्यतो सरसकट स्कॅनर वापरण्याचं टाळावं. तिथे रोखीनं व्यवहार करावे.
- यूपीआय लाईटने एकाच दिवशी अनेक व्यवहार केले असतील आणि त्यांचे संदेश आले नसतील तर त्याच दिवशी तपासावे.
- एकाद्या व्यवहारासंबंधी तक्रार असल्यास गप्प बसू नये. रक्कम थोडी असेल तर अनेकांची अशी रक्कम मिळून आपलंच नुकसान होतं. तक्रार न केल्यामुळे सर्व काही ठीक असल्याचं समजून तपास यंत्रणा गाफील रहातात.
माझ्याकडून मी हे कसं झालं असेल त्याचा पाठपुरावा करतोय, काही ठोस समजल्यास त्याची माहितीआपल्याला सांगायला आनंद वाटेल.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कर्तकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)