Reading Time: 4 minutes

                शेअरबाजारात मागणी आणि पुरवठा यानुसार इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे शेअर्सचे भाव वर खाली होत असतात. कमीत कमी तोटा आणि अधिकाधिक फायदा, असा येथे भाग घेणाऱ्या प्रत्येकाचा हेतू असतो. सर्वसाधारणपणे जेव्हा मागणी अधिक आणि पुरवठा कमी असेल भावात वाढ व पुरवठा अधिक आणि मागणी कमी  असेल तर भावात घट होते. भागबाजारात वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार एकाच वेळी व्यवहार करीत असल्याने त्यांच्या सामूहिक मानसिकतेवर बाजार खालीवर होत असतो आणि तो कालांतराने कोणतीतरी एक दिशा पकडतो .

  •  समुहाची वेगवेगळी मानसिकता होण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये एखाद्या व्यवसायात आलेली तेजी मंदी, सरकारी धोरण, कररचनेतील बदल, देशांतर्गत स्थिती , जागतीक स्थिती, नैसर्गिक आपत्ती, पावसाचा अंदाज  कंपनीच्या धोरणातील बदल, कामगीरी, कंपनीविषयी पसरलेली अफवा इत्यादी अनेक कारणांमुळे अनेक लोकाना त्या कंपनीचे समभाग आपल्याकडे असावेत अथवा नसावेत असे अचानक वाटू शकते.
  • तर बाजारातील काही घटक आपासातील संगनमताने कृत्रिमरीत्या खरेदी विक्री करून भावात मोठ्या प्रमाणात फरक पाडू शकतात. यामूळे छोट्या गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते असे होवू नये म्हणून सेबीने दररोज एका विशिष्ठ मर्यादेतच भाव रहावेत यासाठी गतीरोधक बसवले आहेत. यांना सर्किट फिल्टर्स असे म्हणतात. 
  • सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बाजार व्यवस्थापन कमिटी ही मर्यादा किती असावी ते ठरवते. या गतीरोधकामुळे किमान त्यादिवशी तरी आधीच्या बंद बाजारभावापेक्षा विहित मर्यादेतच वरखाली होतील.
  • डेरिव्हेटिवमध्ये असलेले शेअर्स सोडून सध्या ही मर्यादा 2, 5,10, 20% असून या  प्रकारांत विभागली असून अपवादात्मक परिस्थिथित ती मधे बदल होवू शकतो.
  • या मर्यादेत ऑर्डर टाकता येते, ज्यावेळी आपणांस संगणक पडद्यावर फक्त खरेदीदार अथवा फक्त विक्रेते दिसतात.तेव्हा त्याचा उल्लेख अप्पर /लोअर सर्किट लागले आहे असा करण्यात येतो. 
  • डेरिव्हेटिवमध्ये बाजारभावात खूप फरक पडून सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सुरवातीस 10% मर्यादेत भाव रोखले जाऊन नंतर ही मर्यादा पाच, पाच टक्क्याने वाढवण्यात येते.
  • गतीरोधकाप्रमाणे या बाजारात काही थांबेही आहेत त्यांना सर्किट ब्रेकर्स म्हणतात.समभाग किंवा निर्देशांकात (Share or Index) त्यात मर्यादेपलीकडे बाजारभाव कमी अथवा जास्त झाले तर हे थांबे कार्यान्वित होवून व्यवहार काही काळ किंवा त्या दिवसापुरते त्यातील सर्व व्यवहार थांबवले जातात.

हे वाचा : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवा. 

  • सध्या सेन्सेक्स आणि निफ्टी मधील तसेच काही निवडक समभाग यांना  10,15 आणि 20% बाजारभाव जास्त कमी होण्यावर असे थांबे बसवले आहेत.
  • 10% या मर्यादेच्या जवळपास कोणत्याही एका बाजारात (BSE/NSE) जर दुपारी 1 पर्यंत चढ उतार  झाली तर 45 मिनिटे दोन्ही बाजारतील व्यवहार थांबवले जातात आणि 15 मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी (ज्यामध्ये एक निश्चित भाव मिळतो) देवून एक तास थांबवले जातात.
  •  जर परिस्थिती 1 नंतर परंतू दुपारी 2:30 पर्यंत उद्भवली तर 15 मिनिटे व्यवहार थांबवून 15 मिनीटे प्री कॉल ऑक्शन साठी देवून अर्ध्या तासाकरिता थांबवले जातात आणि 2:30 आल्यास त्या दिवसापूरते यातील व्यवहार थांबवले जात नाहीत.
  • जर अशी परिस्थिती बाजार चालू झाल्याझाल्याच उद्भवली आणि एकदा व्यवहार थांबवून व्यवहार पुन्हा सुरू झाले त्यानंतर 10% फरक पडला तर व्यवहार थांबवले जात नाहीत मग दुपारी एक पर्यत 15% चढ उतार झाली तर 1तास 45मिनिटे व्यवहार थांबवून 15मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी देवून दोन तास थांबवले जातात.
  • दुपारी एक ते दोन मधे 15% चढ उतार  झाली तर 45 मिनीटे थांबवून 15 मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी देवून एक तास थांबवले जातात.
  • जर दोन नंतर 15%कमी जास्त फरक पडला तर  उरलेल्या पूर्ण वेळेसाठी व्यवहार थांबवले जातात.
  • दिवसभरात कधीही 20% कमी जास्त फरक पडला तर उरलेल्या पूर्ण वेळेसाठी व्यवहार थांबवले जातात.

सर्किट फिल्टर आणि सर्किट ब्रेकर लागल्याने छोट्या गुंतवणूकदारांचे संभाव्य नुकसान कमी होते. त्याचप्रमाणे जे खरेखुरे गुंतवणूकदार आहेत ते अचानक झालेली घट अथवा वाढ यामुळे गोंधळून जावू शकतात. त्यांना आपल्या गुंतवणूकीचे संदर्भात पुनर्विचार करून योग्य निर्णय घेण्याची संधी मिळते.

  • निर्देशांक एका मर्यादेत रहावा यासाठी सर्किट ब्रेकर्स आहेत. त्याचप्रमाणे शेअर्सचे भाव एका दिवसात विशिष्ट मर्यादेत रहावे, सट्टेबाजी होऊ नये या हेतूने डेरिव्हेटिव व्यवहार ज्या शेअर्समध्ये होतात ते वगळून इतर सर्व शेअर्सना सर्किट फिल्टर लावले आहेत. 
  • हे फिल्टर्स 2%, 5%, 10%, 15%, 20% या मर्यादेत असून कोणत्या शेअर्सला किती असावेत ते स्टॉक एक्सचेंजचे नियामक मंडळ ठरवते. यासाठी उलाढालवाढ, भावात पडणारा फरक व त्यासाठी लागणारा कालावधी आणि कंपनीचे एकूण बाजारमूल्य या सर्वांचा विचार केला जातो.

 अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट : फिल्टरची वरची मर्यादा गाठल्यास, फक्त खरेदीदार आणि विक्रेते नाहीत. त्यास अप्पर सर्किट लागले असे म्हणतात. येथे फक्त विक्री करता येईल. याउलट फिल्टरने खालची मर्यादा गाठल्यास, फक्त विक्रेते आणि खरेदीदार नाहीत त्यास लोअर सर्किट लागले असे म्हणतात. यामध्ये फक्त खरेदी करता येऊ शकते. जे शेअर्स टी गृपमध्ये आहेत त्या सर्वांची सरसकट सर्किट फिल्टर मर्यादा 5% किंवा त्याहून कमी असते.

  • वेळोवेळी त्याचा आढावा घेऊन बदल केले जातात. अलीकडे मोठ्या प्रमाणात तेजी आल्याने बाजारभावात चढउतार दिसत असल्याने डेरिव्हेटिवमधील शेअर्सना 10% मर्यादा लावून नंतर त्यात बदल केला जातो.

डेरिव्हेटिवमध्ये असलेल्या शेअर्सच्या रोख आणि डेरिव्हेटिव मधील व्यवहारांच्या बाबतील 03 जून 2024 पासून महत्वाचे बदल केले जाणार आहेत. सध्या असलेले नियम असे आहेत –

  • हे शेअर्स आधल्या दिवसाच्या बंद भावाहून 10% मर्यादेत वरखाली होतील. जेव्हा वरील मर्यादेत फक्त खरेदीदार दिसतात त्याला अपर सर्किट लागले असे म्हणतात. या दराने विक्री होऊ शकते. खरेदी व्यवहार होतीलच याची खात्री नसते. याच्या उलट स्थितीस लोअर सर्किट लागले असे म्हणतात या बाजारात येथे केवळ विक्रेते असतात. 
  • यानंतर ही मर्यादा 5% ने वाढवण्यापूर्वी त्यात 25 व्यवहार वेगवेगळ्या 5 लोकांनी केलेले असावेत. 
  • मर्यादा वाढवल्यावर 15 मिनिटांचा कुलिंग पिरियड असेल ज्यात पूर्वीच्या मर्यादेत व्यवहार होत राहतील.
  • अस्तित्वात असलेल्या या नियमांचे पालन करून बाजारात काही जण भावात फेरफार होईल अश्या गोष्टी करीत असावेत असा बाजार नियंत्रकांचा आनंद आहे त्यामुळेच वरील नियम थोडे अधिक कडक केले आहेत.

हे वाचा  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सरकारी कंपन्यांमध्ये तूफान तेजी !

आता 10% मर्यादा कायम आहे मात्र ती वाढवण्यापूर्वी-

  • 25 ऐवजी 50 व्यवहार झाले असावेत.
  • ते वेगवेगळ्या 10 लोकांनी केलेले असावेत.
  • यात किमान 3 ट्रेडिंग मेंबर्सनी (मुख्य दलाल) यांनी भाग घेतलेला असावा.
  • या बदलांशीवाय 5% व्यवहार मर्यादा वाढवल्यावर 15 मिनिटांचा कुलिंग टाइम होता त्यात बदल करण्यात  आला आहे.
  • पहिल्या दोन व्यवहार मर्यादा 5% रिसेट केल्यावर 15 मिनिटांचा कुलिंग टाइम राहील.जर अशी स्थिती दुपारी तीन नंतर उद्भवली तर ही वेळ मर्यादा 5 मिनिटांची असेल.
  • यानंतरच्या दोन व्यवहार मर्यादा 3% ने रिसेट होऊन यातील कुलिंग टाइम अर्धा तास असेल.यानंतरची मर्यादा 2% ने रिसेट केली जाऊन कुलिंग टाइम एक तास करण्यात येईल.

सेबीच्या म्हणण्यानुसार –

  • व्यवहार मर्यादेची टक्केवारी कमी कमी केल्याने या मर्यादेबाहेरील ऑर्डर्स आपोआप रद्द होतील त्यामुळे भावातील चढ उतारांवर आळा बसेल.
  • ज्यांना व्यवहार करायचा आहे त्यांना नव्या मर्यादेत नव्याने ऑर्डर्स टाकाव्या लागतील.
  • रोख आणि डेरिव्हेटिव प्रकारात कोणत्याही एका सेगमेंटमध्ये आणि एका एक्स्चेंजवर असे अपर वा लोअर सर्किट लागल्यास सर्व सेगमेंट आणि सर्व बाजारात एकाच वेळी सावधगिरीची पाऊले उचलून त्याचे संभाव्य विपरीत परिणाम थांबवता येतात.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक आहेत.)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

रेपो रेट म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes आरबीआय वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते. आरबीआय रेपो दरात (Repo Rate) काय बदल करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. 

Market Cap: मार्केट कॅप म्हणजे काय रे भाऊ?

Reading Time: 2 minutes “मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचे लघु रूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप  १० लाख कोटींपेक्षा जास्त झाल्याचे नुकतेच तुम्ही वाचले असेल. याचाच अर्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने नक्की काय साध्य केले, हे समजण्यासाठी “मार्केट कॅप” म्हणजे काय समजणे आवश्यक आहे.

Insurance : आरोग्य विमा आणि जीवन विमा यातला नेमका फरक काय?

Reading Time: 3 minutes आजकाल बाजारात प्रत्येक गोष्टीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.अगदी कपडे, दागिने,महागड्या वस्तू –…

आरोग्य साक्षरता – जेनेरिक औषधांचे फायदे

Reading Time: 2 minutes आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर तपासून औषधे लिहून देतात. ही औषधे ब्रँड नेम (व्यावसायिक नावाने) परिचित असतात. भारतीय बाजारपेठेत अनेक औषध कंपन्या अस्तित्वात आहेत. या सर्व औषध कंपन्यांनी औषधे कशी बनवावीत यासाठी  Indian pharmacopoeia नावाचे एक पुस्तक आहे. त्यात दिलेल्या पद्धतीनुसारच सर्व कंपन्यांना औषधे बनवावी लागतात. Indian pharmacopoeia मध्ये वेळोवेळी भर पडत असते ती नवनवीन शोधांची व त्यामुळेच तो परिपूर्ण होत असतो.