Reading Time: 5 minutes

वैयक्तिक आर्थिक नियोजनात आयुर्विमा हा विषय महत्त्वाचा असूनही त्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही. आयुर्विम्याचा संबंध मृत्यूशी असल्यामुळे त्यावर मोकळेपणाने चर्चा होत नाही. त्यामुळेच अनेक चुकीचे समज निर्माण होऊन पसरत राहतात. त्यात विमाविक्रेत्यांनी पिढ्यानपिढ्या वापरलेल्या चुकीच्या मार्गांमुळे भरच पडते.

आयुर्विम्याविषयीचे समाजात अनेक गैरसमज आहेत. ते काय आहेत याचा थोडा खोलात जाऊन विचार करू.

गैरसमज १:

प्रत्येकालाच आयुर्विम्याची गरज असते.

वस्तुस्थिती:

ढोबळमानानं जरी हे खरं असलं तरी त्याला अपवाद असू शकतात. तुमच्यावर आर्थिकदृष्ट्या कोणी अवलंबून नसेल आणि कुठलीही कर्जफेड करायची शिल्लक नसेल तर तुम्हाला आयुर्विम्याची गरज नाही. तसेच, जर तुमची सांपत्तिक स्थिती अशी असेल, की तुमच्या अनुपस्थितीत मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होऊ शकतील, तर तुम्हाला आयुर्विम्याची गरज नाही.

गैरसमज २:

तरुण वयात आयुर्विमासंरक्षणाची गरज कमी असते.

वस्तुस्थिती:

अनेकांना वाटतं की तरुण वयात कमी रकमेचा विमा काढला तरी चालेल. मात्र हा समज योग्य नाही. ढोबळमानानं प्रत्येकाच्या आयुष्यातील ३५ वर्षं (वयाच्या पंचविशीपासून साठीपर्यंत) अर्थार्जनाची असतात. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मासिक १०,००० रुपये पगार कमावणारी व्यक्ती- दरवर्षी केवळ ८ टक्क्यांनी पगार वाढत गेला असं धरलं तर- या ३५ वर्षांत दोन कोटी कमावणार असते. तरुण वयात या दोन कोटींतील सर्वात जास्त रक्कम ही अनार्जित असते, भविष्यात मिळणार असते. अर्थातच त्या व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यूमुळे एवढ्या मोठ्या रकमेपासून तिचे कुटुंबीय वंचित राहणार असतात. त्यामुळे तरुण वयात आयुर्विमा संरक्षणाची गरज सर्वात अधिक असते. नुकतेच अर्थार्जन सुरू केलेल्या २५ वर्षांच्या व्यक्तीनं वार्षिक उत्पन्नाच्या १५-२० पट विमा घेणं गरजेचं ठरतं.

गैरसमज ३:

नोकरीच्या ठिकाणी मिळणारा आयुर्विमा पुरेसा असतो.

वस्तुस्थिती:

आताच्या काळात लहानमोठ्या बऱ्याचशा कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी समूह आयुर्विमा संरक्षण (ग्रुप इन्शुरन्स) विकत घेतात. अनेकांना हे विमासंरक्षण पुरेसं वाटू शकतं आणि मग वेगळी विमा पॉलिसी कशाला घ्या, असा विचार केला जातो. मात्र अनेक कारणांसाठी नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या विम्यावर अवलंबून राहता येत नाही. त्यातील पहिलं म्हणजे, नोकरीची अनिश्चितता. ज्या क्षणी तुमची नोकरी सुटते त्या क्षणी तेथील विमासंरक्षणदेखील संपुष्टात येतं. दुसरं म्हणजे, नोकरीच्या ठिकाणी मिळणारं विमासंरक्षण तेथील तुमचं पद, कामाचं स्वरूप इत्यादीवर अवलंबून असतं. त्यामुळे त्याचा तुमच्या गरजेशी ताळमेळ असेलच असं सांगता येत नाही. तिसरं म्हणजे, जर तुम्हाला आयुष्यात उशिरा नव्याने विमा पॉलिसी काढायची वेळ आली तर प्रीमियमचा हप्ता चांगलाच महागडा पडू शकतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच स्वतंत्र विमा पॉलिसी असणं कधीही योग्य.

गैरसमज ४:

घेतलेली पॉलिसी चुकीची असली तरी शेवटपर्यंत निभावावी लागते.

वस्तुस्थिती:

अनेकदा एजंट लोक मुद्दामहून असा गैरसमज पसरवत असतात. पारंपरिक एन्डोमेंट, मनी-बॅक किंवा यूलिप पॉलिसी आपण हवी असल्यास मधेच बंद करू शकतो. अर्थात त्याची किंमत मोजावी लागते. मागे म्हटल्याप्रमाणे पहिल्या वर्षीच्या प्रीमियम हप्त्यातील काहीच परत मिळत नसते, तर पुढील दोन प्रीमियमपैकी ३० टक्के रक्कम परत मिळते. काही पॉलिसींमध्ये वार्षिक प्रत्यावर्ती बोनस लागू झाला असल्यास मिळू शकतो. त्याचप्रमाणे प्रीमियम भरण्याची ठरावीक वर्षं पूर्ण झाली असल्यास पॉलिसी पेडअप करण्याची सुविधा असते. त्यात पुढील हप्ते भरावे लागत नाहीत. जितके हप्ते भरले त्या प्रमाणात विमासंरक्षण आणि परतावा कमी होतात. याचे तपशील मूळ पॉलिसीपत्रावर सोदाहरण स्पष्ट केलेले असतात. त्यासाठी कंपनीकडून आलेलं मूळ पॉलिसीपत्र नीट वाचणं गरजेचं आहे.

गैरसमज ५:

केवळ कर्त्याला/कमावत्या व्यक्तीलाच आयुर्विम्याची गरज असते.

वस्तुस्थिती:

वास्तविक अर्थार्जन न करणाऱ्या व्यक्तीचा विमा काढणं जरुरीचं नसतं. त्याला काही अपवाद आहेत. घर सांभाळणारी गृहिणीदेखील घरासाठी, कुटुंबासाठी योगदान देत असते. तिच्या अनुपस्थितीत ही कामं करण्यासाठी पगारी माणसं ठेवावी लागणार असतील किंवा कमावत्या व्यक्तीला स्वतःची नोकरी-व्यवसाय सोडून पूर्णवेळ घरासाठी द्यावा लागणार असेल तर अशावेळी गृहिणीचाही आयुर्विमा काढलेला असणं गरजेचं ठरतं.

गैरसमज ६:

भरपाईदाव्यासाठी एजंटची गरज असते.

वस्तुस्थिती:

तुम्ही घेतलेल्या आयुर्विमा पॉलिसीवर विक्रेत्याला दरवर्षी कमिशन मिळत असतं. त्यामुळे पॉलिसीसंदर्भातील प्रत्येक कामात त्यानं/तिनं मदत करणं अपेक्षित असतं. मात्र एजंटची उपस्थिती अनिवार्य कधीच नसते. आयुर्विमा हा तुम्ही आणि विमाकंपनीत झालेला करार असतो, त्याच्या संदर्भातील कुठल्याही गोष्टीत तुमच्या समस्यांचं समाधान करण्याची जबाबदारी कंपनीची असते. तुम्ही दाव्याची कागदपत्रं थेट कंपनीकडे पाठवून दावापूर्ती करून घेऊ शकता. यात अडचण आल्यास विमानियामक महामंडळानं (IRDA) नियुक्त केलेल्या लोकायुक्ताकडे (Ombudsman) तक्रार नेऊ शकता.

गैरसमज ७:

परतावा न मिळणाऱ्या टर्म पॉलिसीचे हप्ते भरणं म्हणजे पैसे फुकट घालवणं!

वस्तुस्थिती:

टर्म प्लानमुळे आपल्याला दुहेरी फायदा होतो, हे गेल्याच आठवड्यात आपण पाहिलं. तेवढ्याच बजेटमध्ये आपण दुप्पट विमासंरक्षण आणि दुप्पट गुंतवणूक परतावा मिळवू शकतो. कुठलीही विमाकंपनी हजारो, लाखो ग्राहकांकडून प्रीमियमच्या हप्त्याद्वारे पैसे एकत्र करत असते. या एकत्रित साठवलेल्या निधीतून ज्या ग्राहकांचा मृत्यू होईल त्यांच्या कुटुंबाला मदत केली जाते- विम्याची रक्कम अदा केली जाते. त्यामुळे अशा टर्म प्लानसाठी आपण भरलेला प्रीमियमचा हप्ता फुकट गेला असं मानण्याची गरज नाही. आपली गरज उद्भवेल तेव्हा त्याच एकत्रित निधीतून आपल्याला विमासंरक्षणाची रक्कम मिळणार असते.

गैरसमज ८:

माझ्या वार्षिक उत्पन्नाएवढे विमासंरक्षण पुरेसं आहे.

वस्तुस्थिती:

विमासंरक्षणाची गरज ही व्यक्तीसापेक्ष असते. आपलं वार्षिक उत्पन्न, आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या व्यक्ती, त्यांची वयं, त्यांच्या भविष्यातील गरजा, आपल्यावरील कर्ज, आपली मालमत्ता इत्यादी घटकांच्या आधारे किती रकमेचा विमा काढावा ते ठरतं. ढोबळमानानं बघता, पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी असलेल्या ३५ वर्षांच्या व्यक्तीला त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या १०-१२ पट विमा गरजेचा आहे. तर वयाच्या ४५-५०व्या वर्षी त्याच व्यक्तीला वार्षिक उत्पन्नाच्या ७-८ पट विमा असून चालू शकेल.

गैरसमज ९:

स्वस्तातली स्वस्त विमा पॉलिसी सर्वात उत्तम .

वस्तुस्थिती:

स्वस्त म्हणजेच मस्त? भारतीय लोक खर्चाबद्दल अतिजागरूक समजले जातात. कमीतकमी खर्चात एखादे काम कसे काय होईल ते पाहण्याकडे त्यांचा कल असतो. आणि हाच दृष्टीकोन ते विमा घेताना सुद्धा वापरताना दिसतात. मात्र आयुर्विमा पॉलिसी ही एखाद्या पॅराशूटसारखी असते. त्यामुळे स्वस्त-महागपेक्षा ती जास्तीत जास्त भरवशाची, खात्रीची असणे गरजेचे असते. त्यासाठी विश्वासार्ह म्हणता येईल अशा नामांकित विमाकंपनीकडूनच विमा घ्यावा. तसेच कंपनीचे दरवर्षी दावेपूर्तीचे आकडे तपासून पाहावेत. १००%च्या जास्तीत जास्त जवळ दावेपूर्ती करणारी कंपनी चांगली समजावी.

गैरसमज १०:

एकदा का आयुर्विमा पॉलिसी घेतली की पुन्हा त्या विषयाचा विचार करायची गरज नाही.

वस्तुस्थिती:

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अर्थार्जन सुरु केल्यानंतर लवकरात लवकर आयुर्विमा घ्यावा. मात्र दर २-३ वर्षांनी बदलत्या परिस्थितीत तो पुरेसा आहे की नाही ते तपासून बघणं गरजेचं असतं. आपले उत्पन्न वाढते, कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात, आपण कर्ज काढतो / फेडतो. ह्या सगळ्याबरोबर आपली विमासंरक्षणाची गरज बदलत असते. १० वर्षांपूर्वी काढलेला २५ लाखाचा विमा आता तोकडा पडू लागतो. तेव्हा जास्तीचा विमा काढण्याला पर्याय नसतो.

गैरसमज ११:

मुलाच्या किंवा मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी त्यांच्या नावाने विमा पॉलिसी / ‘चिल्ड्रेन प्लान’ घ्यावेत.

वस्तुस्थिती:

आपल्या अपत्याचे सुरक्षित भवितव्य हा प्रत्येक पालकासाठी भावनिक विषय असतो. या हळवेपणाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न विमा कंपन्या आणि त्यांचे विक्रेते करत असतात. त्यासाठीच निरनिराळ्या नावांनी ‘चिल्ड्रेन प्लान’ काढून ते गळ्यात मारण्याचा प्रयत्न आयुर्विमा कंपन्या करत असतात. मात्र आपण हे लक्षात घेतले पाहिजे की लहान मुलांच्या नावाने आयुर्विमा काढून काहीच साध्य होणार नसते. त्यापेक्षा त्यांच्या नावाने सुयोग्य गुंतवणूक केली, आपल्या गुंतवणुकीत / आयुर्विम्यात त्यांचे नामांकन केले तर अधिक चांगले.

गैरसमज १२:

पूर्णायुषी (Whole Life) आयुर्विमा घ्यावा / जास्तीत जास्त वयापर्यंत विमासंरक्षण घ्यावं.

वस्तुस्थिती:

आयुर्विम्याची गरज ही सेवानिवृत्तीपर्यंतच असते. एकदा का आपण अर्थार्जन थांबवले आणि जमा केलेल्या निर्वाहनिधीतून खर्च भागवायला सुरुवात केली की आयुर्विम्याची गरज संपलेली असते. आपल्यापैकी बहुतेकांसाठी हा काळ वयाच्या ६०व्या वर्षी सुरु होतो. त्यामुळे त्यानंतर आयुर्विमा अनावश्यक ठरतो. परंतु वयाच्या पंच्यात्तरीपर्यंत विमासंरक्षण देत असल्याने पूर्णायुषी पॉलिसीमधे वार्षिक हप्ता इतर पर्यायांपेक्षा फार जास्त पडतो. त्यापेक्षा वयाच्या साठीपर्यंतच विमा घ्यावा आणि कमी प्रीमियममुळे वाचलेल्या रकमेतून गुंतवणूक पुंजी तयार करावी हे उत्तम.

हे सगळे समज-गैरसमज प्रत्येक वाचकाला लागू होतीलच असे नाही. तसेच तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील, आयुर्विम्याबद्दल काही गोष्टी ‘सत्य की मिथ्या’ असा प्रश्न पडला असेल तर आम्हाला नक्की कळवा.

– प्राजक्ता कशेळकर

(प्राजक्ता या पुणेस्थित आर्थिक नियोजन तज्ञ असून गेल्या ७ वर्षांपासून त्या आर्थिक नियोजनाची सेवा देत आहेत. प्राजक्ता यांच्याशी संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा : http://pro-f.in/contact-us/ )

जीवन विमा आणि आरोग्य विम्यामधील मूलभूत फरक,

गुंतवणुकीसंदर्भात काही प्रश्न (FAQ) व त्याची उत्तरे,

जीवन विमा पॉलिसीचे प्रकार आणि करबचत,

कोणता आयुर्विमा घ्यावा? सोचना क्या,जो भी होगा देखा जायेगा !!!

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
1 comment
  1. I’ll right away take hold of your rss as I can’t to find your e-mail subscription link or e-newsletter service.
    Do you’ve any? Kindly allow me recognize so that I could subscribe.
    Thanks.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.